कल्याण : कल्याण डोंबिवली मनपा कडून माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत पुरस्कार मिळवल्याचा बडेजाव केला जात असला तरी मागील अनेक दिवसांपासून कल्याण डोंबिवली शहरातील कचऱ्याचे ढीग पाहता मनपा प्रशासन खरेच शहरातील स्वच्छते करिता काम करीत आहे का? असा प्रश्न उपस्थित करत, पुढील १० दिवसांत कचऱ्याची समस्या न सोडविल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा कल्याण पश्चिमचे माजी आमदार व भाजपा भटके विमुक्त आघाडीचे संयोजक नरेंद्र पवार यांनी आयुक्तांना पत्र लिहून दिला आहे.
कल्याण डोंबिवली शहर व विशेषतः कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कचऱ्याची समस्या अत्यंत भयावह झाली आहे, ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा केला जात नाही, बहुतांश भागात घंटागाडी जात नाही, प्रत्येक विभागात दिवसभर कचरा पडून असतो, दिवसांत एक वेळा तरी रस्ते स्वच्छ करणे अपेक्षित असताना त्यावर सुध्दा काम होत नाही. या संदर्भात स्थानिक मनपा प्रशासनाला वारंवार संपर्क करून, तक्रार करून सुध्दा कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही.
आता पावसाळा सुरू झाला आहे, पहिल्याच पावसात मनपाच्या नालेसफाईची पोलखोल झाली, कल्याण टॉकीज रस्त्यावर पूरस्थिती निर्माण होऊन रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याची वेळ आली. कचऱ्यावर तात्काळ उपाय योजना करण्यात आली नाही तर नाले तुंबून रस्त्यांवर व अनेक भागात नागरिकांच्या घरात सुध्दा पाणी जाणार आहे. ही अत्यंत गंभीर समस्या असून कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत आहे.
कचरा उचलण्याच्या नावाखाली नागरिकांकडून अधिकचे पैसे घेणाऱ्या मनपा प्रशासनाने शहरातील कचरा समस्या गांभीर्याने घेऊन सोडवली नाही तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसह हजारो नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा सुध्दा नरेंद्र पवार यांनी यावेळी दिला आहे.
0 Comments