कल्याण : राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये प्रत्येक निवडणुकीत रस्सीखेच सुरू असते मात्र कल्याण पंचायत समिती उपसभापती निवडणुकीत सर्व पक्षीय सदस्य एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. पंचायत समितीच्या उपसभापती पदी सर्वपक्षीय सदस्यांनी भरत गोंधळे यांची बिनविरोध निवड केली आहे.
पंचायत समितीच्या कार्यकारिणीचा ६ महिन्यांचा कालावधी बाकी असून कल्याण तालुक्याच्या विकासासाठी सर्वपक्षीय सदस्य एकत्र आल्याचे यावेळी भरत गोंधळे यांनी सांगितले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रवींद्र घोडविंदे, वंडार पाटील आदींसह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
कल्याण पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना ४, राष्ट्रवादी ३ आणि भाजपा ५ असे पक्षीय बलाबल असल्याने व राज्यात महाविकास आघाडी चे सरकार स्थापन झाल्याने अपेक्षेप्रमाणे कल्याण पंचायत समितीवर शिवसेना राष्ट्रवादीची सत्ता स्थापन होणे अपेक्षित होते.
सभापती, उपसभापती याच पक्षाला मिळायला हवे होते, भरत गोंधळे यांचे नावही आघाडीवर होते, परंतु महाविकास आघाडीतील सदस्य फुटल्याने अनपेक्षितपणे भाजपाला संधी मिळाली व गोंधळे यांचे पद हुकले. अभ्यासू, मासिक सभेत प्रशासनाला धारेवर धरणारा एकमेव सदस्य म्हणून गोंधळे यांची कल्याण पंचायत समिती मध्ये ओळख आहे.
कल्याण पंचायत समितीचे एकूण १२ सदस्य होते, परंतु खोणी गणाचे किरन ठोंबरे यांचे सदस्य पद रद्द करण्यात आल्याने आता ११ सदस्य आहेत. यामध्ये रेश्मा भोईर (सभापती) दर्शना जाधव, भारती टेंभे, अस्मिता जाधव, रंजना देशमुख, अनिता वागचौरे, पांडुरंग म्हात्रे, भरत गोंधळे, रमेश बांगर, यशवंत दळवी, भरत भोईर, यांचा समावेश आहे.
आज उमेदवारी अर्ज भरतेवेळी कल्याण पंचायत समितीचे सभापती व सर्व सदस्य, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदस्य रमेश बांगर यांनी सूचक म्हणून भरत गोंधळे यांच्या उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी केली. गोंधळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली.
0 Comments