भिवंडी दि 10 (आकाश गायकवाड ) : खासदार राहुल गांधी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भिवंडीतील एका जाहीर सभेत वक्तव्य केले की, आरएसएसच्या कार्यकर्तांनी महात्मा गांधी यांची हत्या केली.
यामुळे आरएसएसची बदनामी झाल्याचे सांगत राहुल गांधी यांच्या विरोधात आरएसएसचे राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर आज जलदगती न्यायालयात सुनावणी होऊन या दाव्याची सुनावणीसाठी पुढील २२ फेब्रुवारीला होणार असल्याचे न्यायाधीश जे व्ही पालीवाल यांनी सुनावणीवेळी दोन्ही पक्षकारांच्या वकिलांना सांगितले.
पक्षकारांच्या दोन्ही वकिलांची बाजू घेऊन आदेश..
भिवंडी न्यायालयामध्ये राजेश कुंटे विरुद्ध राहुलजी गांधी यांची मानहानी बाबत सुनावणी चालू असतांना आज फिर्यादी तर्फे ऍड प्रबोध जयवंत व ॲड गणेश धर्गळकर यांनी फिर्यादीच्यावतीने तहकुबी करिता अर्ज दिला. सदर अर्जामध्ये त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय मुंबई व प्रथमवर्ग न्यायालय भिवंडी यांच्या आदेशाविरुद्ध रिट याचिका क्र.8883/2021 दाखल केलेली आहे. त्यामुळे .सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर या दाव्याची सुनावणी घ्यावी असा तहाकुबी अर्ज देऊन युक्तिवाद केला. परंतु सदर प्रकरणास स्थगिती आदेश आले नसल्याने सदरचे प्रकरण हे पुढील तारखेस फिर्यदीचा पुरावा नोंदिण्यासाठी ठेवण्यात आले.
तर राहुल गांधी यांच्याकडून ऍड. नारायण अय्यर यांनी बाजू मांडली. त्यांनी देखील राहुल गांधी हे गोवा, पंजाब व उत्तरप्रदेश येथे निवडणूक असल्याने ते व्यस्त असल्याने यांचा देखील गैरहजेरीचा अर्ज दिला असता न्यायालयाने अर्ज मजूर केला. दोन्ही पक्षकारांच्या अर्जावरील युक्तिवाद पाहून भिवंडी न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश जे.व्ही. पलीवाल यांच्या न्यायालयासमोर सुनावणी होऊन पुढील तारीख २२ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत.
काय आहे प्रकरण ...
भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथील मैदानावर झालेल्या २०१४ साली लोकसभा निवडणूकीच्या प्रचारसभेत राहूल गांधी यांनी महात्मा गांधींजींची हत्या आरएसएसनेच घडवून आणली, असे खळबळजनक वक्तव्य केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी आरएसएसचे शहर जिल्हा कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. या याचिके विरोधात राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेवून सदरच्या याचिकेची सुनावणी दिल्ली न्यायालयांत करण्याची विनंती केली होती.
त्यावेळी राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रासोबत भाषणातील उतारा दाखल केला होता. तो उतारा भिवंडी कोर्टात पुरावा म्हणून दाखल करून घ्यावा, असा अर्ज याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी न्यायालयाकडे केला होता. परंतू मागील १२ जून २०१८ रोजी भिवंडी न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळी राहूल गांधी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले होते.
तसेच राहुल गांधी यांच्या वकीलांनी ही याचिका समन्स ट्रायल प्रमाणे चालविण्याची मागणी केली तसेच उच्च न्यायालयातील कागदपत्रे भिवंडी न्यायालयांत दाखल करून घेण्यास न्यायालयास विरोध दर्शविला होता. त्यावेळी ही याचिका समन्स ट्रायल प्रमाणे चालविणयास न्यायालयाने मान्यता दिली होती.
0 Comments