कल्याण, प्रतिनिधी : - ओमायक्रॉन व्हेरीयंटचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शनिवारी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने महापालिका हद्दीतील व्यापारी, दुकानदार आणि हॉटेल्स चालकांची बैठक घेतली .या बैठकीत केडीएमसीने कोरोना नियमांचं पालन करावे अशी सूचना दिल्या तसेच व्यापारी, दुकानदार, कर्मचारी आणि ग्राहकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले हवेत अन्यथा मनपा प्रशासनाच्या पथकाकडून दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा दिला.
कल्याण डोंबिवली मनपा मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला शहरातील विविध आस्थापनांचे प्रतिनिधी, व्यापारी, दुकानदार, हॉटेल चालक उपस्थीत होते. ओमायक्रॉनच्या धर्तीवर नवे नियम राज्य सरकारने लागू केले आहेत. दुकाने, हॉटेल, व्यापारी याठिकाणी होत असलेले गर्दी टाळली पाहिजे.
दुकानात ग्राहक आणि कर्मचाऱ्यांनी मास्क वापरावे , सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे आदी विविध कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी व्यापारी, दुकानदार, हॉटेल चालकांना केले. दुकानदार, ग्राहक, दुकानातील कर्मचारी यांचे लसीकरण झालेले हवे. त्यांनी पहिला आणि दुसरा डोस घेऊन चौदा दिवस झालेले हवेत. अन्यथा दंड आकारण्यात येईल.
दुकानात ग्राहक कर्मचाऱ्याने मास्क घातला नाही तर १० हजार रुपये दुकानदाराला दंड आकारला जाईल. रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांना यापूर्वी प्रमाणे पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. हॉटेल चालकांना ५० टक्के ग्राहक क्षमतेने हॉटेल चालविण्याची मुभा आहे. त्याच बरोबर दुकानदारांनी कोरोना नियमावली पालन केले नाही. तर ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने तपासणी पथके तयार केली आहे. ही पथके कार्यरत आहेत. त्यात पोलिसांची मदत घेऊन संयुक्त कारवाई केली जाणार आहे.
व्यापाऱ्यांनी कोरोना काळात प्रशासनाला नेहमीच सहकार्य राहिले आहे. मात्र कोरोना काळात केवळ दुकानदारांवर कारवाई न करता रस्त्यावरील फेरीवाल्यांकडेही गर्दी होते. त्याकडेही लक्ष दिेले पाहिजे याकडे व्यापारी संघटनेचे पदाधिकारी राकेश मुथा यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले .
0 Comments