■कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची वृक्षसंवर्धना साठी धडक कारवाई पर्यावरण प्रेमीं कडून कारवाईचे स्वागत, वृक्षसंवर्धनविषयक कायद्याची जनजागृती करण्याची अंघोळीची गोळी संस्थेची मागणी...
कल्याण , कुणाल म्हात्रे : झाडांवर लोखंडी खिळे आणि तारेचा वापर करून विद्युत रोषणाई आणि बॅनरबाजी करण्यास हरित लवादाने सक्त मनाई केली आहे. तसेच अशा पध्दतीने झाडांना इजा पोहचवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याच बाबतीत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने वृक्षसंवर्धनासाठी परिपत्रक काढून कारवाई हाती घेतल्याची माहिती सचिव संजय जाधव यांनी दिली.
महानगरपालिकेने २० ऑक्टोबर २०२१ रोजी परिपत्रक काढले असुन शहरांत मोठ्या प्रमाणात झाडांना पोस्टर, बॅनर, खिळे आ णि झेंडे काढण्याचे काम सुरू झाले आहे. अंघोळीची गोळी ही पर्यावरणविषयक काम करणाऱ्या संस्थेच्या खिळेमुक्त झाडं उपक्रम अंतर्गत महाराष्ट्रभर झाडांवर ठोकलेले खिळे, बॅनर, पोस्टर, झेंडे काढण्याचे काम अनेक युवक करत आहेत. त्याचबरोबर झाडांना मातीचे आळे असावे आणि झाडांच्या पायथ्याशी सिमेंट काँक्रीट आणि पेव्हर ब्लॉक लावण्यात येवु नये आणि झाडांना गेरू आणि चुना व्यतिरिक्त इतर कोणतेही रंग लावले जावु नयेत.
झाडांना लावण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या नादुरुस्त असल्यास काढण्यात याव्यात. यांसाठी संस्था वेळोवेळी महाराष्ट्रभर विविध महानगरपालिकांशी पत्रव्यवहार करत आहे. दिवसेंदिवस होणारी तापमानवाढ रोखायची असल्यास वृक्षसंवर्धन हाच एकमेव प्रभावी उपाय असल्याने विभागाने तात्काळ कारवाई केल्याने पर्यावरणप्रेमींनी या कृतीचे स्वागत केले आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात झाडांवर, पथदिव्यांच्या खांब्यांवर वाटेल तशा जाहिराती लावल्या जातात. झाडांना खिळे देखील ठोकले जातात. याबाबत वर्तमानपत्रात नोटीस प्रसिद्ध करून या जाहिराती काढण्याच्या सूचना नागरिकांना केल्या. त्याच दरम्यान कायापालट अभियानांतर्गत प्रमुख रस्ते घेत सुमारे ५०० हून अधिक झाडांवर लावलेल्या जाहिराती काढण्यात आल्या.
यापुढेही सर्व प्रभाग क्षेत्रातील सर्व सहाय्यक आयुक्तांना पालिका आयुक्तांनी आदेशित केले असून यापुढे जेव्हा जेव्हा झाडांवर जाहिराती आढळतील तेव्हा संबंधितांवर शहर विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अशाप्रकारे झाडांवर जाहिराती न करण्याचे आवाहन महापालिका सचिव तथा मुख्य उद्यान निरीक्षक संजय जाधव यांनी केले आहे.
दरम्यान वृक्षसंवर्धनासाठी प्रत्येक महानगरपालिकेने परिपत्रक काढुन नागरिकांना वृक्षविषयक कायद्याविषयी अवगत करणे आणि दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली तरच शहरांतील वृक्षसंवर्धन होईल यांसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया अंघोळीची गोळी खिळेमुक्त झाड अभियानाचे अविनाश पाटील यांनी दिली.
0 Comments