कल्याण , कुणाल म्हात्रे : स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करणाऱ्या कंगणा राणावत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कंगणाचा ‘पद्मश्री’ परत घेण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे कल्याण जिल्हा अध्यक्ष जयदीप सानप यांनी केली असून याबाबत त्यांनी कल्याणचे पोलीस उपायुक्त संजय गुंजाळ यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
भारताला ‘१९४७ साली मिळाले ते स्वातंत्र्य नसून भीक आहे, खरे स्वातंत्र्य २०१४ साली मिळाले’, असे बेताल वक्तव्य करुन अभिनेत्री कंगणा राणावत हिने हजारो स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे. कंगणाचे विधान हा देशद्रोहच आहे. भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी मोठा संघर्षपूर्ण व दिर्घ लढा द्यावा लागला आहे. ब्रिटिशांच्या जुलमी, अत्याचारी राजवटीला भारतातून हाकलून लावून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले. परंतु अभिनेत्री कंगणा राणावत सारख्या काही अविचारी, बेताल व्यक्तीने स्वातंत्र्यसानिकांचा अपमान केला आहे.
अशा व्यक्तीला पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करणे हा पुरस्काराचाही अपमानच आहे. त्यामुळ तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन पद्मश्री पुरस्कारही परत घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग कल्याण जिल्हा अध्यक्ष जयदीप रमेश सानप यांनी केली आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष लखपत सिंह राजपूत जिल्हा उपाध्यक्ष राजा जाधव, विनोद शिंपी, रियाज सय्यद, अनिल पवार यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments