भिवंडीत गंभीर गुन्हे घडलेल्या चारही ग्राम पंचायतीचे निकाल 'धक्का' देणारे..
भिवंडी , प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रापंचायतीच्या निवडणुका भिवंडी तालुक्यात होत्या. त्यातच ग्रामपंचायत निवडणूकावरून प्रचाराच्या काळात भिवंडीतील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुक प्रचारा काळातच ४ गंभीर गुन्हे घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. मात्र या चारही ग्रामपंचायती निकाल धक्का देणारे लागल्याने दादागीरी करून राजकारण चालत नसल्याचे मतदारांनी दाखून दिले आहे.
पहिल्या घटनेत काल्हेरच्या शिवसेना शाखा प्रमुखावर गोळीबार ....
काल्हेरचे शिवसेना शाखा प्रमुखावर प्रचारदरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात शुटरीने गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली होती. ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून गोळीबार झाल्याचा आरोप ग्रामपंचायत निवडणुकीत काल्हेर गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख दिपक म्हात्रे यांनी केला होता. तर पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या ३ आरोपीना अटक केली. मात्र आजचा निकाल पाहता याठिकाणी शिवसेनेची सत्ता असलेल्या काल्हेर ग्रामपंचायतीवर भाजपने कब्जा केला. याठिकाणी सर्वच भाजपचे उमेदवार निवडणून आले.
दुसऱ्या घटनेत भाजप - शिवसेनेत रक्तरंजित राडा ..
गूंदवली गावात ग्रामपंचायत निवडणुकीवरून भाजप - शिवसेना कार्यकर्त्यांच्या दोन गटामध्ये रक्तरंजित राडा झाला होता. या दोन्ही गंभीर गुन्ह्याची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात दाखल करून दोन्ही गटातील राडेबाजांना अटक केली. मात्र या ठिकाणी शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखून भाजपच्या पॅनलचा धुव्वा उडविला. विशेष म्हणजे शिवसेनेचे ग्रामीण भागातील बडे नेते बाळा मामा याच गावातील रहिवाशी आहेत.
तिसऱ्या घटनेत महिला उमेदवाराची जाळली होती कार ..
खारबाव ग्रामपंचायत हद्दीत एका महिला उमेदवाराची चारचाकी वाहन जाळून मतदारांमध्ये भीती निर्माण केल्याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र हि महिला उमेदवार निवडणून आली शिवाय त्यांचे राष्ट्रवादीचे पॅनल असलेले खारबाव विकास आघाडीचे संपूर्ण उमेदवार निवडून येऊन या ठिकाणी शिवसेना व भाजपाला जोरदार झटका दिला.
चौथ्या घटनेत तर चक्क निवडणूक कार्यलयातच हाणामारी ..
निवडणूक कार्यलयातच चक्क दोन्ही उमेदवारानी जोरदार राडा केला होता. हे दोन्ही उमेदवार निंबवली ग्रामपंचायत निवडणुकीला उभे होते. त्यामध्ये राष्ट्रवादीचे गणेश गुळवी तर शिवसेनेकडून प्रवीण गुळवी यांच्या पॅनलमध्ये थेट लढत होती. मात्र प्रचाराच्या दरम्यान शिवसेनेचे प्रवीण गुळवी यांच्या गटातील काही कार्यकर्त्यांनी गावात बेकायदा बॅनर लावल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे गणेश गुळवी हे भादवड येथील निवडणूक कार्यलयात तक्रार करण्यासाठी गेले होते.
त्यावेळी दोघांमध्ये अचानक कार्यलयातच वाद होऊन वादाचे रूपांतर हाणामारीत झाले होते. या वेळी दोन्ही गटातील कार्यकर्ते आमनेसामने येत तुफान हाणामारी झाली होती. मात्र या ठिकाणीही शिवसेनेचे पॅनल पराभूत होऊन राष्ट्रवादीचे पॅनल विजयी ठरले. तर दुसरीकडे भिवंडी तालुक्यात एकूण ५६ ग्रामपंचयातीच्या निवडणुकासाठी ५७४ उमेदवारांपैकी यापैकी ३ ग्रामपंचायती बिनविरोध होऊन तालुक्यात एकूण १०८ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.

Post a Comment