भिवंडीत ५६ पैकी ३० ग्राम पंचायतीत भाजपाचे कमल फुलले
भिवंडी तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यातील वळ, आलिमघर, निवळी आणि चिंचवली-खांडपे ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. त्यात भाजपा व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सहमती झाली होती. मात्र, उर्वरित ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणूका चुरशीच्या मानल्या जात होत्या. भाजपाविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस एकत्र आली होती.
मात्र, खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला चांगलेच यश मिळाले. तालुक्यातील ५६ पैकी ३० ठिकाणी भाजपाला निर्विवाद बहूमत मिळाले. तर आणखी चार ठिकाणी भाजपाला युतीच्या माध्यमातून सत्ता मिळणार आहे. तालुक्यातील काल्हेर, शेलार या दोन्ही श्रीमंत ग्रामपंचायतींवर भाजपाची सत्ता प्रस्थापित झाली आहे. खासदार कपिल पाटील यांच्या गावातील दिवेअंजूरमध्येही भाजपाचा झेंडा फडकला.
पुर्णा, माणकोली, पिंपळास, झिडके, कुकसे, ओवळी, लामज, लाखिवली, वडघर, डुंगे, जुनांदुर्खी, अंजूर, पिंपळनेर आदी ग्रामपंचायती भाजपाने जिंकल्या आहेत. तर खारगाव व निंबवली ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली. खासदार कपिल पाटील म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला होता. मात्र, गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारकडून भिवंडीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र असूनही भाजपाला मतदारांनी पसंती दिली.
भिवंडीत ५६ पैकी ३० ग्राम पंचायतीत भाजपाचे कमल फुलले
Reviewed by News1 Marathi
on
January 18, 2021
Rating:

Post a Comment