चार दिवासात केडीएमसी च्या तिजोरीत १० कोटी ५८ लाखांचा भरणा
■अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घेण्याचे पालिका आयुक्तांचे आवाहन...
कल्याण ,कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली मनपाने १५ आँक्टोबर ते ३१ डिसेंबर पर्यंत मालमत्ता कर थकबाकी असणाऱ्या नागरिकांसाठी अभय योजना सुरू केली असुन गेल्या चार दिवसात अभय योजनेअंतर्गत मालमत्ता कर भरणापोटी तब्बल १० कोटी ५८ लाख रूपये जमा झाल्याने मनपाच्या तिजोरीत भर पडली आहे.
मनपाच्या वतीने १५ आँक्टोबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२० कालावधी पर्यंत मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांसाठी अभय योजना सुरू असुन अभय योजनेस मालमत्ता कर थकबाकी दारांचा प्रतिसाद लाभत आहे. गेल्या ४ दिवसात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांनी तब्बल १० कोटी ५८ लाख रुपये मनपा तिजोरीत जमा केले आहेत. २५ नोव्हेंबर रोजी १ कोटी १४ लाख रूपये, २६ नोव्हेंबर रोजी ३ कोटी ३१ लाख रूपये, २७ नोव्हेंबर रोजी २ कोटी ८२ लाख रूपये, २८ नोव्हेंबर रोजी ३ कोटी १ लाख रूपये इतकी रक्कम मालमत्ता करापोटी महापालिकेत जमा केली आहे.
नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत. आणि जास्तीत जास्त नागरिकांनी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत लागू असलेल्या अभय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. १५ ऑक्टोबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत लागू असलेल्या अभय योजना २०२० मध्ये संपूर्ण थकबाकीसह चालू वर्षाच्या कराची संपूर्ण रक्कम तसेच व्याजाची २५ टक्के रक्कम एक रकमी भरल्यास ७५ टक्के व्याज माफ केले जाणार आहे.

Post a Comment