टीएमटीच्या ताफ्यात अतिरिक्त 100 बस गाड्यांचा समावेश करापरिवहन सदस्य शमीम खान यांची मागणी
ठाणे ,प्रतिनिधी : ठाणे शहरात सध्या सार्वजनिक वाहतूक सेवा पुरविणार्या टीएमटी सेवेची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. त्यामुळे ठाणेकरांना इतर वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यासाठी टीएमटीच्या ताफ्यामध्ये अतिरिक्त 100 बसगाड्यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या यांच्या आदेशानुसार परिवहन समिती सदस्य शमीम खान यांनी केली.राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि संघर्षच्या महिलाध्यक्षा ॠता आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शमीम खान यांनी गुरुवारी नवनिर्वाचित परिवहन समिती सभापती विलास जोशी आणि स्थायी समिती सभापती संजय भोईर यांची भेट घेतली.
या भेटीमध्ये त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. शमीम खान यांनी दिलेल्या निवेदनानुसार, नागरिकांना सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ मिळावा, यासाठी टीएमटीच्या ताफ्यामध्ये 100 नवीन बसगाड्यांचा समावेश करण्यात यावा; ठाणे शहरात इलेक्ट्रीक बसगाड्या चालविण्याची मागणी आपण केली आहे. या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी एमएमआरडीए स्तरावर प्रयत्न सुरु केले आहेत. या संदर्भात त्यांनी एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांच्याशी चर्चा केली होती. तसेच, आपण भेट घेतली असता राजीव यांनी या बसगाड्या चालविण्याबाबत अनुकूलताही दर्शविली होती.
त्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनीदेखील या मागणीचा गांभीर्याने विचार करुन तसे पत्र एमएमआरडीएला दिले आहे या मागणीची तत्काळ पूर्तता करुन त्यापैकी काही बसगाड्या कळवा- मुंब्रा भागासाठी राखीव ठेवण्यात याव्यात; मुंब्रा येथे टीएमटी डेपोसाठी राखीव असलेल्या भूखंडावर तत्काळ आगाराचे काम सुरु करावे; भारत गियर्स ते मुंबई दरम्यान टीएमटीची फेरी सुरु करावी; बस वाहक-चालकांकडून गैरवर्तणूक होत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, तसेच, थांब्यावरच बस थांबविण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या. दरम्यान, शमीम खान यांनी केलेल्या मागण्यांना राष्ट्रवादीचे महाराष्ट्र महासचिव सय्यद अली अशरफ (भाई साहब), ठा.म.पा. गटनेते नजीब मुल्ला, नगरसेवक शानू पठाण यांनी अनुकूलता दर्शविली असल्याने या सर्वांचे खान यांनी आभार मानले.

Post a Comment