मास्कच्या कारवाईत पावती बुक नसल्याने पोलीस आणि नागरिकांचा खोळंबा
कल्याण | कुणाल म्हात्रे : कोरोनाचा प्रादुभार्व रोखण्यासाठी पालिकेकडून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरु असून या कारवाईत पालिकेच्या कर्मचार्यांनी वेळेत पावती पुस्तक उपलब्ध न केल्याने कारवाई करणाऱ्या पोलीस आणि ज्या नागरिकांवर कारवाई झाली आहे त्यांचा खोळंबा झाला. तर एक तास उशिरा येणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांनी सुनावले.
कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अनेक लोकं नियम पाळत नाहीत, मास्क लावत नाहीत अशांवर पोलीस आणि महापालिकेकडून संयुक्त कारवाई सुरु आहे. आतापर्यंत लाखोचा दंड वसूल करण्यात आला आहे. तरीही काही नागरिक ऐकायला तयार नाहीत. आज देखील कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण आपल्या पोलीस पथकासोबत पोहोचले. जवळपास एक तास पोलीस कायदा मोडणाऱ्या नागरिकांना एका बाजूला उभं करुन ठेवले होते.
वारंवार विनंती करुन देखील पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी पावती बुक घेऊन पोहोचले नाही. पावती फाडण्याची जवाबदारी ही महापालिकेची असल्याने, पोलिसांना आणि नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागले. महापालिकेचा एक कर्मचारी याठिकाणी आला. मात्र, त्यांच्याकडे पावती बुक नव्हती, एका तासानंतर पालिकेचे अधिकारी भागाजी भांगरे पोहचले. भांगरे यांना पोलीस अधिकाऱ्यांनी खडेबोल सुनावले.
तुम्हाला काम करायचं नसेल तर नकाकरु, आम्हालाही कामाला नका लावू, एक पावती पुस्तक घेऊन यायला एक तास लागतो. ही कामाची पद्धत नाही. कृपा करुन असं करु नये”, असं पोलीस अधिकाऱ्यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावलं. यानंतर देखील महापालिकेचे अधिकारी शिस्त पाळणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.दरम्यान याबाबत महापालिका अधिकारी भागाजी भांगरे यांच्याशी संपर्क साधला असता, पोलिसांचा फोन आल्यावर त्यांना पावती पुस्तक उपलब्ध करून दिले असल्याचे सांगितले.

Post a Comment